शेवगाव तालुक्यातील क-हे टाकळी येथे दलित वस्तीतील सार्वजनिक चावडीची जमीन कंपनीच्या नावे झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गावातील काही सदस्य व सरपंच यांच्या संगनमतातून ही जागा कंपनीकडे हस्तांतरित केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.ही जागा गावकऱ्यांच्या सामूहिक उपयोगाची असून, सार्वजनिक मालकी हक्क असलेली असल्याने ती कोणत्याही कंपनीकडे देणे कायदेशीर आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांकडून जोरदारपणे उपस्थित करण्यात येत आहे.यामुळे संपूर्ण गावात संतापाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की “सार्वजनिक हक्काची दलित वस्तीची चावडीची जागा कोणाच्या परवानगीशिवाय खासगी कंपनीच्या नावावर कशी जाऊ शकते ? ”ग्रामस्थांनी या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ही जमीन परत गावाच्या मालकी हक्कात द्यावी, अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे.आता ग्रामपंचायत व प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
