संपादक सतीश मिरपगार
श्रीरामपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे आणि स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ साचत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर आज श्रीरामपूर नगरपालिकेकडे कडक निवेदन देण्यात आले.हे निवेदन इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले आहे. असलम आवद बिनसाद यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी व प्रशासक प्रांताधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्या मांडल्या.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सद्यस्थितीत स्मारक परिसरातील अस्वच्छतेमुळे शिवस्मारकाच्या शोभेला बाधा पोहोचत असून ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळाची प्रतिष्ठा धोक्यात येत आहे. हे स्मारक पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार मा. सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेले असून त्याची नियमित देखभाल करणे ही प्रशासनाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी आहे.स्मारक परिसरालगतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर माती साचल्याने धुळीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे परिसरातील नागरिक व दुकानदारांना श्वसनविषयक त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पत्रकार संघाने निवेदनात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दररोज सकाळी नियमित साफसफाई करण्यात यावी, स्मारक परिसरासाठी कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी नेमण्यात यावा, रस्त्यावरील साचलेली माती तात्काळ हटवून नियमित पाणी फवारणी करण्यात यावी तसेच स्वतंत्र देखभाल यंत्रणा उभी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.जर या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली नाही, तर पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
यावेळी असलम बिनसाद, जयेश सावंत, रवींद्र आसने, इमरान शेख, राजेंद्र सूर्यवंशी, संदीप आसने, इनायत आतार, प्रवीण साळवे, मयूर पिंपळे, शोएब शाह, संजय वाहुल, अभिषेक बारसे यांच्यासह शहर व परिसरातील मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.
