प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पाथर्डीतील शासकीय विश्रामगृहाची पाहणी करत स्वच्छतेच्या दयनीय स्थितीवर संतप्त प्रतिक्रिया नोंदवली.

आवारातील कचरा, अस्वच्छ परिसर, झाडांची ढासळलेली अवस्था पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रातोरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर झळाळून टाकला. सहा महिन्यांपासून साठलेली घाण एका रात्रीत गायब झाली. दौंडहून परतुरकडे जाताना पाथर्डी येथे थांबल्यानंतर पवारांनी वातावरणातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत, परिस्थिती सुधारण्याची जवाबदारी आमदार शिवाजी गर्जे यांच्याकडे सोपवण्यात आली. “आता निष्काळजीपणा चालणार नाही,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय महामार्गालगतचे हे प्रमुख शासकीय विश्रामगृह असूनही खोलींची अपुरी व्यवस्था, पूर्णवेळ चौकीदाराचा अभाव, तुटक फर्निचर, परिसरात फिरणारी मोकाट जनावरे, व्हीआयपी सूटमध्ये आवश्यक साहित्याचा तुटवडा अशा समस्या कायम होत्या.
मागील काही महिन्यांत झाडे, बाग व परिसराची देखभालही पूर्णपणे बिघडली होती. स्वच्छतागृहाच्या मागे साचलेला कचरा व दुर्गंधीही सतत जाणवत होती. डस्टबिन्सपर्यंत उपलब्ध नव्हते.
मोहटादेवी, मढी, भगवानगड आदी ठिकाणांना भेट देणारे मान्यवर, अधिकारी, व्हीआयपी पाहुणे येथे मुक्काम करीत असतात. तरीही वाढीव सुविधांचा प्रस्ताव फक्त कागदावरच अडकलेला आहे.
काही वर्षांपूर्वीच्या चौकीदाराच्या स्वच्छता व्यवस्थेचे कौतुक आंध्र प्रदेशच्या आमदाराने केले होते, मात्र सध्याची स्थिती त्याच्या पूर्ण विरुद्ध आहे. योगायोगाने उपमुख्यमंत्र्यांचा दौरा लागल्याने विभागीय उदासीनतेचा मुद्दा जनतेसमोर आला.
नागरिकांचे मत असे की,
अजित पवार यांसारख्या नेतृत्वाने दरवेळी पाहणी केली, तर विश्रामगृहाची दुरावस्था कायमची संपेल. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही जिल्हा दौरा अपेक्षित असल्याने विस्तारित विश्रामगृहाचा आराखडा मंजूर होऊन नवीन स्वरूप साकारले, तर पवारांचा संतापही सार्थ ठरेल.
