पाथर्डी प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या मोठ्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळावी, या मागणीसाठी आज ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना निवेदन सादर केले.

या वेळी आमदार आदरणीय मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली. अलीकडील मुसळधार पावसामुळे तिसगाव व परिसरातील शेतीमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतजमिनीतील मातीही वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हे निवेदन कृषिमंत्री भरणे यांना देण्यात आले. या प्रसंगी तिसगाव ग्रामस्थांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषिमंत्री भरणे यांनी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
