सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष पुन्हा एकदा पावसाकडे वळले आहे. जून-जुलैमध्ये काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला तर काही भागात ढग फिरकलेच नाहीत.

मात्र ऑगस्ट महिन्यात मान्सूनचा जोरदार मेघगर्जना आणि मुसळधार सरींसह अनुभव आला. या पावसामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, पण काही ठिकाणी शेतमाल आणि जनजीवनावर प्रचंड नुकसान झाले.आता सप्टेंबरकडे पाहताना हवामान खात्याने दिलेला अंदाज उत्सुकता वाढवणारा आहे. या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत देशभरात 743.1 मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल सहा टक्के जास्त आहे. जूनमध्ये 180 मिमी, जुलैमध्ये 294.1 मिमी तर ऑगस्टमध्ये 268.1 मिमी पाऊस झाला. म्हणजेच तीन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असला तरी त्याचे असमान वितरण मोठ्या चिंतेचा विषय ठरला आहे. काही भागांत मुसळधार सरींचा तडाखा बसला तर काही ठिकाणी पाऊस जवळजवळ टाळकाच राहिला.सप्टेंबरमध्ये मात्र एकंदरित पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. मात्र ईशान्य व पूर्व भारतातील काही राज्ये, दक्षिण भारतातील काही भाग तसेच उत्तर-पश्चिमेकडील प्रदेशांमध्ये पर्जन्यमान अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, हवामान तज्ञ मृत्युंजय महापात्रा यांनी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन व अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. तर हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानात मान्सूनचा जोर कमी होईल असे सांगण्यात आले आहे.एकंदरीत, सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 109 टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जून महिन्याच्या तुलनेत तब्बल 23 टक्क्यांनी अधिक पावसाची नोंद या महिन्यात होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे मान्सूनचा निरोप घेणारा हा महिना शेतकऱ्यांसाठी संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येणार आहे.
