मुंबई : मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाची लढाई लढतायेत. त्यांचा राजकारण्यांवर, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर रोष असेल, त्यावर माझे काही म्हणणे नाही. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जरूर टीका करावी. परंतु या राजकारणात मुख्यमंत्र्यांच्या आईला ते का ओढतायेत? जर ते पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईवर बोलले तर आम्ही सहन करणार नाही. मागील दोन दिवसांपासून मला धमकीचे फोन येतायेत. लोक शिवीगाळ करतायेत पण मी घाबरणारी नाही. जे उचकायचे ते उचका, माझे नाव चित्रा वाघ आहे, असे सणसणीत प्रत्युत्तर भाजप नेत्या, आमदार चित्रा वाघ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.
मनोज जरांगे यांनी बीडच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करून भाजप नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप नेत्यांच्या टीकेचा जरांगे पाटील यांनीही समाचार घेतला. आणच्या आयाबहिणींवर लाठीचार्ज केला, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, त्यावेळी हे सर्व जण कुठे गेले होते? असा सवाल करून माझ्या नादाला लागली तर गबाळ उचकीन, असा इशारा जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांना दिला. त्यांच्या याच टीकेवर चित्रा वाघ यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोलला तर आम्ही गप्प बसणार नाही
चित्रा वाघ म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतायेत. त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवावा. यादरम्यान त्यांचा राजकारण्यांवर रोष असेल. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे. मी तो अधिकार नाकारत नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या आईचा या सगळ्यात संबंध कुठे येतो? तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईला या सगळ्यात ओढले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
काय गबाळ उचकायचं ते उचक, मी कुणाला घाबरत नाही, माझे नाव पण चित्रा वाघ
मागील दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचे मला फोन येतायेत. धमकीच्या फोनवर मला नको नको ती शिवीगाळ होतेय. मी गेली २७ वर्षे राजकारण समाजकारणाच्या क्षेत्रात आहे. मला या सगळ्याची सवय आहे. पण मुद्द्यांवरची लढाई आता थेट वैयक्तिक पातळीला गेलीये का? त्यांना माझे सांगणे आहे की काय गबाळ उचकायचं ते उचका, मी कुणाला घाबरत नाही, माझे नाव पण चित्रा वाघ आहे… अशा शब्दात चित्रा वाघ यांनी जरांगे पाटील यांना उत्तर दिले.
तुम्ही तुमची लढाई लढा, कुणाच्याही आया बहिणीला बोल लावू नका
हे चुकले तरी आम्ही त्यांना काहीच बोलायचे नाही. चुकले हे दाखवायचे नाही आणि दाखवले तर सगळी टोळधाड हे लोक आमच्यावर सोडणार. तुम्ही शुद्ध हेतून लढताय, तुम्ही तुमची लढाई लढा पण यामध्ये कुणाच्याही आया बहिणीला बोल लावू नका, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
