प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी करताना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पूरग्रस्तांना धीर दिला.

जालन्यावरून बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्याकडे जाताना त्यांनी मालेवाडी आणि खरवंडी कासार येथे थांबून पुरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्यासह चर्चेतून पूरग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीदरम्यान आमदार मोनिका राजळे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, राहुल कारखेले, अमोल गरजे, माणिक खेडकर, अशोक खरमाटे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावोगावच्या ग्रामस्थांनी आणि महिलांनी मुंडे यांना निवेदन देत भरीव मदत व पुनर्वसनाची मागणी केली.
संवाद साधताना मुंडे म्हणाल्या की, अचानक कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीने शेतीसह सर्वच क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली असून शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभे आहे. “संकटाशी सामना करण्यासाठी एकत्रितपणे काम करून शेतकऱ्यांना मोठा आधार द्यावा लागेल. शासनाचे धोरण लवकरच जाहीर होऊन पूरग्रस्तांना निश्चित दिलासा मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
