प्रतिनिधी – सचिन दिनकर
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टी आणि महापूरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी संपूर्ण भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, माजी सभापती क्षितिज घुले, भाजप तालुकाध्यक्ष धनंजय बडे, माजी सभापती विष्णू पंत अकोलकर यांच्यासह कृषी व महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते.भरणे म्हणाले की, मे, जून, ऑगस्ट आणि विशेषतः सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून आतापर्यंत साडेसात लाख एकर शेती पिकांना फटका बसला आहे. यातील सहा लाख 34 हजार एकर क्षेत्र सप्टेंबरमध्येच बाधित झाले आहे. महसूल व कृषी विभागाचे अधिकारी युद्धपातळीवर पंचनामे करत असून पुढील पंधरा दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण होतील.ते पुढे म्हणाले की, हवामान बदलामुळे एकाच वेळी मोठा पाऊस पडल्याने नदीपात्र व ओढ्यालगतची अतिक्रमणे पाण्याचा प्रवाह रोखत आहेत, त्यामुळे नुकसान वाढले आहे. शासन येत्या काळात या अतिक्रमणांवर कठोर पावले उचलेल. नैसर्गिक संकटे, गारपीट, दुष्काळ यामुळे शेतकरी अडचणीत असला तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम आहे. कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे योग्य वेळी निर्णय घेतील, असा विश्वासही भरणे यांनी व्यक्त केला.
