February 20, 2026

अहिल्यानगरमध्ये दोस्तीवर गंडांतर! एका क्षुल्लक वादाने एवढं भयंकर रूप धारण केलं की, विश्वास ठेवणंही कठीण वाटावं.

दुचाकी आडवी लावण्यावरून सुरू झालेल्या वादातून मित्रांनीच मित्रावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ८ सप्टेंबरच्या रात्री निलक्रांती चौकाजवळील हनुमान पान शॉप परिसरात घडली आणि शहरात खळबळ उडाली.

अभिषेक साखरे आणि चेतन बनसोडे हे दोघे रात्री मित्रांसोबत गप्पा मारत असताना फक्त एका दुचाकीच्या जागेवरून वाद निर्माण झाला. पुढच्याच क्षणी परिस्थिती हाताबाहेर गेली. ऋतीक साळवेने दुचाकी आडवी लावल्याने रागाचा भडका उडाला आणि अमोल पाडळे, अक्षय पवार, रुपेश गायकवाड आणि निखील साळवे हे मित्र घटनास्थळी धावत आले. कोणालाही विश्वास बसणार नाही इतक्या निर्दयीपणे त्यांनी अभिषेक आणि चेतनवर लोखंडी रॉडने हल्ला चढवला.

चेतनच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ गंभीर वार झाले आणि तो बेशुद्ध पडला. मित्राने वाचवण्याचा प्रयत्न केला तरी हल्लेखोरांनी थांबण्याची तयारी दाखवली नाही. संकटाची जाणीव होताच अभिषेकने तत्काळ पियुष उंबरवालला फोन केला. काही क्षणांत पियुष आणि अभिजीत आल्हाट घटनास्थळी पोहोचले आणि चेतनला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

ही घटना शहरात भीती आणि अस्वस्थतेचे सावट घेऊन आली असून नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. पोलिसांनी अमोल पाडळे, ऋतीक साळवे, अक्षय पवार, रुपेश गायकवाड आणि निखील साळवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तिघे अजून फरार आहेत. हे सर्व आरोपी निलक्रांती चौकाजवळ राहणारे आणि परस्पर मित्र असल्याचे समोर आले आहे. तपास सुरू असून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे.

नगरच्या रस्त्यावर दोस्तीचा विश्वास हादरवणारी ही घटना पुन्हा एकदा विचार करायला लावणारी ठरली आहे एका क्षणाच्या रागाने किती मोठं संकट ओढवू शकतं याचा धक्का संपूर्ण शहराला बसला आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!